पालघर : ‘जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल गतिमान होऊन सर्वत्र स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी कार्यरत राहू. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून पालघर जिल्हा परिषदेचे कामकाज पारदर्शकरित्या करण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जनजागृतीसाठी ‘उघड्यावर शौचास प्रतिबंध’ या डिजिटल व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती खिलारे, महिला बालकल्याण अधिकारी राजेंद्र पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धुमाळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. पतंगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामस्थ व विद्यार्थी स्वच्छतेवरील माहितीपट व जाहिराती डिजिटल व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा, गावातील सार्वजनिक ठिकाणे, बाजार आणि ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
या व्हॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात १३ बाय आठचा डिजिटल स्क्रीन बोर्ड, पडदा ३६० अंशामध्ये फिरविण्याची सुविधा, १५ केव्हीची जनरेटर सुविधा, वायफाय, पाच हजार लोकांना एकाच जागेवर बसून पाहण्याची सुविधा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना उघड्यावर शौचास जाण्यास प्रतिबंध करणे व शासनामार्फत बांधून देण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश या उपक्रमामागे आहे.